Wednesday, October 10, 2012

मन चिंती ते वैरीही न चिंती .....


  
मनाला आवर घाला,सावरा,सुधारा असं म्हणणं खूप सोपं असतं परंतु ते              
कृतीत उतरवणं हे महाकठीण..! मनाचा वेग प्रकाश वेगापेक्षाही अधिक आहे
असं म्हणतात . कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आणि केल्यानंतर मनाचा
त्या गोष्टीला पूर्ण पाठींबा आणि सहकार्य असणं हे फार आवश्यक असतं. 
अनेकदा माणूस मन आणि कृती यात साधर्म्य नसल्याने पश्चात बुद्धीला
शरण जाताना दिसतो,परंतु तेव्हा काहीही करणं शक्क्य नसतं कारण 
हातातून वेळ निसटून गेलेली असते. मनाचा जसा वेग जास्त तसाच वेळेचाही 
आहेच,म्हणूनच म्हणतात की, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. त्याचप्रमाणे
कृती हातून घडली की ती माणसाच्या हातावेगळी झालेली असते. 
असं असलं तरीही मन आणि बुद्धी यात सतत सुसंवाद ठेवल्यास कृतीवर
नियंत्रण नक्की मिळवता येतं. 
आजकाल असं चित्र दिसून येतं की माणूस स्वतःलाच अत्त्यंत दुय्यम दर्जाची 
वागणूक देतो. तेच तेव्हा त्याला योग्य वाटतं परंतु त्यानंतरचे परिणाम काय होतील 
याची त्याला जाणीव होत नाही. सध्या आपल्या आजूबाजूला वरचेवर ऐकू येणाऱ्या घटना म्हणजे
आत्महत्त्या, दरोडा,हाणामाऱ्या, चोऱ्या, कौटुंबिक असलोखा आणि भांडणं  
आणि बरंच काही....ऐकून मन विषण्ण होतं. 
माणूस एकीकडे स्वतःची ओळख निर्माण करण्याकरता झगडतोय परंतु त्यातल्या अपयशामुळे,
विचारातल्या अप्रगल्भतेमुळे स्वतःची ओळख निर्माण करण्याऐवजी अधोगतीकडे चालला आहे. 
याला कारणीभूत घटक म्हणजे स्व-आदराची भावना नसणे आणि स्वाभिमानाची कमतरता असणे.
ज्याला मानस शास्त्रीय भाषेत  lack of self-respect  आणि self-esteem असं म्हणतात. 
जोवर स्वतःला आदर दिला जात नाही तोवर समाजात वावरताना स्वतःसाठी योग्य काय
आणि अयोग्य काय हे समजणं अशक्क्य आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या वागण्याने दुसऱ्याला 
काय वाटेल हे समजणं तर त्याहून दुरापास्त! म्हणूनच आज व्यक्ती आणि समाज यात प्रचंड
दरी निर्माण झालेली दिसते. हेच काय, पण १०वी ची परीक्षा दिलेल्या अपयशाच्या कारणाने 
स्वतःचा जीव संपवणाऱ्या मुलांना आपल्या आई-वडिलांच्या भावनांचं काहीच वाटू नये? 
स्वतःचा संसार थाटून झाल्यावर, आपली मुलं मोठी झाल्यावर आपल्या वृद्ध आई वडिलांना 
वृद्धाश्रमात टाकणार्यांच्या मनांना काहीच वेदना होऊ नयेत? ..परवाच वर्तमानपत्रात 
वाचल्याप्रमाणे आईने खूप रडणाऱ्या आपल्या बाळाला मारून टाकलं..किती ही मानसिक विकृती! 
मातृत्वावरचा विश्वास उडावा अशी बातमी होती ती. हीच गोष्ट मी काहीजणांना सांगितली तर 
पहिला प्रश्न हाच की, ती मुलगी होती की मुलगा? हा अपेक्षित प्रश्नच नव्हे पण आज समाजाच्या
मनात आजूबाजूच्या परिस्थितीमुळे किती संकुचितता निर्माण झाली आहे हे समजतं.  
समाजमन तेव्हाच सशक्त होईल जेव्हा प्रत्त्येक व्यक्ती आपली कृती करताना स्वतःच्या आणि इतरांच्या
हिताचा विचार करेल. वैयक्तिक संवेदनशीलताच सामाजिक संवेदनशीलतेला जन्म देऊ शकते. 
एकदा समुपदेशन करताना एका तरुण मुलाच्या तोंडचे उद्गार असे होते की, मला परदेशी
शिकायला जायचं एक महत्वाच कारण म्हणजे मला आई बाबांच्या पिंजर्यात अडकायचं 
नाहीये..मी विचारलं,अरे, शिकायला जाणार न तू? मग असं का म्हणतोस? तर म्हणे, 
ते तर आहेच पण आई बाबा नसणार हा माझ्यासाठी bonus आहे...थक्क झाले मी ऐकून.
यात पालकांचीही बरीच चूक आहे हे अमान्य करताच येणार नाही. अशावेळी पालकांनी विचार करावा,
आयुष्यभर  जे केलं, त्याचं फलित हेच? मग आपण कुठे कमी पडतोय का?..
केवळ गरजा भागवणं, वेळेला कौतुक करणं, चार लोकांच्यात त्याची चर्चा करणं म्हणजे मुल 
वाढवणं आहे का? याचा खरच विचार पालकांकडून होण्याची गरज आहे. 
''मन चिंती ते वैरीही न चिंती'' एवढ्यासाठीच म्हणावसं वाटतं की मन जसं  आपला सखा 
होऊ शकतं तसंच शत्रूही....आणि अशा अधोगतीकडे घेऊन जाऊ शकतं की आपला 
हाडाचा वैरीही आपल्याशी तसा वागू शकणार नाही. 
म्हणूनच ''मनोरथाचे" सर्व दोर आपल्याच हातात आणि त्याची दिशाही ठरवायची आपणच
की जी आपल्याला उन्नतीकडे घेऊन जाईल त्याचप्रमाणे आपल्याशी निगडीत समाजाचाही
त्यामुळे नुकसान तर होणारच नाही परंतु परस्परात आपुलकीचं,विश्वासाचं आणि मित्रत्वाच 
नातं निर्माण होईल जिथे वातावरणातल्या वाईट वृत्ती- प्रवृत्तींना थाराच राहणार नाही आणि
सर्वांचा प्रवास जीवनाच्या सकारात्मकतेच्या दिशेने सुरु होईल.