Friday, August 17, 2012

.. साधना ..


     ''सिद्ध करते साधकाला जीवनाची साधना'' असे म्हणतात. साधकाला साधनेशिवाय काही अस्तित्वच नाही,किंबहुना पूर्णत्व नाही. डोळसपणे केलेल्या साधनेमुळेच  मिळालेल्या ज्ञानकणांचा पूर्ण अभ्यास साध्य होतो. डोळसपणे केलेली साधना एवढ्यासाठी की, गुरूने दिलेल्या मंत्राला आत्मसात करणे म्हणजे  त्याचा संपूर्ण बारकाईने, स्वतःचे संदर्भ, अनुभव त्याच्याशी निगडीत करून केलेले आचरण..हे त्यालाच शक्क्य आहे जो गुरूने दिलेला मंत्र स्वतःचा जीवनमंत्र म्हणून जोपासण्यासाठी सज्ज असतो. 

          गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नसून ते एक ''तत्त्व'' आहे, ज्यापुढे 'साधक' या भूमिकेतला प्रत्त्येकजण नतमस्तक असतो. हे तत्त्व कधी व्यक्तीत, कधी अनुभवात,कधी परिस्थितीत तर कधी विचार रूपाने प्रत्येकाला गवसत असते. या तत्त्वाप्रती नितांत श्रद्धेने, आदरभावनेने आणि प्रामाणिकपणाने समर्पित असलेलाच त्याच्या प्रगल्भतेचा आणि त्यातल्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. 
         
             पूर्वीच्या काळी गुरु-शिष्य परंपरेत गुरूगृही निवास करून ज्ञान संपादन करण्याची पद्धत होती. तिचा गाभा आणि मूळ अर्थ हाच असावा की, ज्ञान संपादनासाठी त्या अनुषंगाने येणारे, करावे लागणारे काम म्हणे त्या ज्ञानाचाच एक भाग. ते लादले गेलेले, सक्ती करून करवून घेतले जाणारे काम नव्हे. म्हणजेच ''ज्ञान" म्हणजे केवळ एका विषयाचे अध्ययन न मानता जीवनावश्यक तत्त्वज्ञानाचे त्या त्या तात्कालिक विषयांच्या माध्यमातून प्राप्त होणारे ज्ञानधन असे मानले जात असे. 
         
            आजच्या संदर्भात बघितले तर 'समर्पण भाव बऱ्याच अंशी व्यावहारिक सोयीनुसार आणि दृष्टीकोनातून तोलला जातो असे वाटते. परवाच 'सरगम' नावाचे एक सुंदर नाटक बघितले खूप वेगळा विचार करून प्राचीन गुरु शिष्य परंपरा आणि आत्ताचा आधुनिक विचार,संकल्पना यावर बेतलेली अतिशय सुंदर कलाकृती खूप दिवसांनी पाहायला मिळाली.  एका मध्यमवर्गीय कुटुंबातलीअसामान्य स्वरज्ञान लाभलेली एक शाळकरी मुलगी,मानसी तिचे नाव. संगीताचे शिक्षण एखाद्या बुजुर्ग गुरूंकडून मिळावे  अशी तिच्या आई वडिलांची इच्छा. शाळेतल्या एका गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे  बक्षिस मिळूनही अतिषय निराश होऊन घरी परतते. आई वडिलांना प्रश्न पडतो की, पहिला क्रमांक येऊन देखील ही एवढी दु:क्खी का? ..
..पण तिने दिलेले  उत्तर ऐकून आपल्याही काळजात लक्कन काही हलल्यासारखे होते ती सांगते, ''मी मधेच बेसूर झाले, आणि बाई  म्हणाल्या की, अगं इथे कोणालाही कळलं नाही तू चुकलीस..म्हणून मला राग आलाय त्यांचा फार.''
आज म्हणजे क्रमांकासाठीच्या चढाओढीत  स्वतःचा सूर गमावून बसतात मुले ...पण अशी मानसी विरळाच..! 
   
                 त्यावेळी घरी आलेले एक पाहुणे सदगृहस्थ ''केदारनाथ'' नावाच्या शास्त्रोक्त संगीताची साधना करणाऱ्या आणि जगभर ख्याती असलेल्या व्यक्तीचे नाव तिच्यासाठी संगीताचे गुरु म्हणून सुचवतात. अत्यंत शिस्तप्रिय, रागीट, कठोर अशा समजल्या जाणाऱ्या केदारनाथांकडे मानसीचे वडील पोहोचतात खरे पण सुरुवातीला त्यांना पूर्ण नकारालाच सामोरे जावे लागते. बऱ्याच प्रकारे विनंती केल्यावर  केदारनाथांचा होकार मिळतो खरा पण एका अटीसह! ती अट म्हणजे मानसीने त्यांच्याकडेच राहून संगीतसाधना करायला हवी, तरच शास्त्रोक्त संगीताचे धडे ती नीट गिरवू शकेल. वडिलांचे  हृदय ते..! मान्य करायला आधी कठीण जाते  पण आपल्या कन्येला जर संगीत साधनेचे  समाधान मिळवून द्यायचे  असेल आणि खऱ्या  अर्थाने तिला संगीत साधक करायचे  असेल तर हे मान्य करण्यावाचून पर्यायच उरत नाही. केदारनाथांसारखे  गुरु लाभल्यावर या अटीचे  काही  वाटत नाही.   केदारनाथांच्या घरी पूर्णवेळ राहून, शाळा, अभ्यास सांभाळून मानसीचा संगीताचा रियाजही चालू होतो. केदारनाथ आणि त्यांच्या पत्नीही तिचा स्वीकार अगदी मुलीसारखा करतात.  केदारनाथांचे घर म्हणजे मानसीसाठी जणू "स्वर मंदिर'' होऊन जाते

                                        
घरामध्ये जणू  तानपुऱ्याच्या सुरांबरोबर मानसी आणि केदारनाथांचा सूरही जुळतो. काही दिवसानंतर तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिका तिचे नाव एका टी.व्ही. वरील वाहिनीच्या महागायिकेच्या स्पर्धेसाठी पाठविण्यासाठी केदारनाथांची संमती घ्यायला येतात. तिचे वय आणि तिची संगीतातली तयारी पाहता केदारनाथ स्पष्ट नकार देतात, परंतु तिचे पालक सर्व करारांवरती सह्या करून तिला स्पर्धेसाठी पाठवतात.
     
                   स्पर्धेत मानसीचा पहिला क्रमांक येतो खरा पण केदारनाथ तिला शिकवण्यास मात्र नकार देतात. त्यांना पूर्ण कल्पना असते ती, या प्रलोभनांमुळे वहावत  जाणाऱ्या या बालमनांची..! या सर्व आकर्षणापुढे ही मुले  साधनेला  अपेक्षित महत्व देऊच शकणार नाहीत असा त्यांचा ठाम विश्वास असतो. 

मानसीने संगीताच्या रियाजाबरोबरच शाळेचा अभ्यास सुद्धा तितकाच लक्षपूर्वक करावा  अशी त्यांची इच्छा असते. म्हणजेच शालेय अभ्यासाला देखील कलेबरोबरच समान न्याय हा आजच्या काळात खरा असणारा आणि ठरणारा विचार मानसीने कृतीत आणावा अशी त्यांची इच्छा असते.,परंतु, स्पर्धेतील बक्षिसासोबत मिळणारी  तात्पुरती प्रसिद्धी, नंतरचे कार्यक्रम, त्यात कपडे, रंगपट यांना दिले जाणारे अवाजवी महत्व यात मानसी पुरती अडकून जाते..तिचा काहीच दोष नसताना!! 
         
           केदारनाथांसारखे गुरु गमावल्याचे  दुःक्ख  आणि स्वतःच्या मनानुसार साधेपणाने कला जपण्याचे  संपलेले  स्वातंत्र्य यामुळे अतिषय निराश झालेली मानसी केदारनाथांशिवाय अन्य कुठेही  शिकण्यास नकार देते..केदारनाथ आणि त्यांच्या पत्नींनी आपल्या मुलीच्या लहानपणी झालेल्या निधनानंतर  जपलेला तानपुरा 
मानसीला रियाजासाठी देऊन  आपलीच मुलगी मानली आहे हे समजल्यावर मानसीच्या आई वडिलांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहतात...परंतु, आई वडिलांसमोर प्रश्न उभा राहतो तो तिच्या पुढील संगीत अध्ययनाचा. यातून सुटण्याचा एकच मार्ग दिसत असतो, तो म्हणजे सर्व करारांमधून मुक्तता करवून घेणे. 
         
            एक दिवस मानसी आणि तिचे आई वडील तडक पोहोचतात ते केदारनाथांच्या घरी.. मानसी तोच तानपुरा घेऊन गायला बसते. केदारनाथ बाहेरून येऊन हे दृश्य 
पाहून  रागावतात..यावर मानसी सांगते की तुम्ही शिकवले नाहीत म्हणून एकलव्यासारखे तुमच्या सीडीवरून मी ही बंदिश बसवली..हे ऐकून केदारनाथ रागावतात तसेच खूप हळवेही होतात मानसीची गुरुवारची निष्ठा पाहून! मानसीचे वडील केदारनाथांना सांगतात की मध्यमवर्गीय कुटुंबातला मी एक साधा संगीत  शिक्षक..या स्पर्धांमधून मिळणाऱ्या पैशांना, प्रसिद्धीला मीच भाळलो आणि मानसीचे नाव पुढे केले..पण तिला एवढ्या मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार हे कळताच मी ते सर्व करार रद्द करवून घेतले आहेत..टीव्ही वरील कार्यक्रमाचे निर्मातेही मानसीच्या निष्ठेची प्रशंसा करतात. मानसीला तिला तिचा खरा सूर गवसतो.   ''मला आस सूर्याची, नका दावू काजवे'' अशा आशयाचे गीत तिच्या तोंडी अगदी चपखल वाटते.. 
अशी "मानसी" प्रत्त्येक संगीतसाधना किंवा अन्य कोणतीही साधना करणाऱ्यात असायला हवी,तसेच शिष्याप्रती देखील एवढे प्रेम, निष्ठा असणारे"केदारनाथांसारखे"गुरुही असायला हवेत म्हणजेच कला ही खरोखरच ईश्वरीय शक्तीपर्यंत घेऊन जाणारे माध्यम आणि कलाकार म्हणजे त्याच ईश्वरीय शक्तीचा उपासक असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल. 

Thursday, August 9, 2012

शाळेत समुपदेशन कशासाठी???

                                             
शालेय जीवनात माणूस एक अत्यंत सुंदर, मनमोकळ आयुष्य जगत असतो. संस्कारक्षम वयामध्ये शाळेत होणारे संस्कार म्हणजे पुढल्या आयुष्यभराची शिदोरी असते. मानसिक आणि शारीरिक बदलांमधून या काळात प्रत्येकजण जात असतो. याच बदलाच्या काळामध्ये गरज असते ती चांगल्या मित्रांच्या संगतीची, शिक्षकांच्या आपुलकीची आणि पालकांच्या प्रेमाची! मनाला उत्तम शिस्त लावण्यासाठी पोषक वातावरण जसं घरी असायला हवं तसंच  शाळेतही असायला हवं कारण मित्र मंडळींचा आणि शिक्षकांचा खूप मोठा पगडा या वयात मुलांवर असतो. ते सांगतील तसंच करण्याकडे कल असतो. या सर्व प्रक्रियेमध्ये शिक्षकांचा आणि पालकांचा खूप मोठा वाटा तर असतोच पण त्यांच्यावर खूप महत्वाची जबाबदारीही असते. 
आजकाल असं दिसून येतं की, एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात आल्याने मुलाला आई,बाबा आणि एखादं भावंड एवढाच परिवार असतो. 
आई - बाबा तर नोकरीच्या कारणाने बरेचसे बाहेर, त्यामुळे मुलाशी घरात बोलायला, गप्पा मारायला दिवसभर कुणीच नाही अशी परिस्थिती असते.
आजकाल संस्कार शिबिरांमधून "आजीच्या गोष्टी'' असं वेगळं सत्र ठेवलं जातं! यावरूनच लक्षात येतं की आजीच  घरात नाही तर मुलाला आजीच्या गोष्टी मिळणार कुठून?  मुल शाळेमध्ये येतं तेव्हा त्याने एका विशिष्ट शिस्तीतच वागणं अपेक्षित असतं, अभ्यास वेळेत पूर्ण करणं  अपेक्षित 
असतं नाहीतर शिक्षकांकडून ओरड होतेच..! म्हणजेच या सगळ्यात मुलांकडून फक्त "अपेक्षांची" ओझी वाहून घेतली जातात असं वाटतं. 
मुलांना अशी एक हक्काची जागा,जिथे  ती आपलं मन मोकळ करू शकतात, आपल्या अडचणी मोकळेपणी सांगू शकतात ती म्हणजे "समुपादेशानासाठीचे दालन "! 
 आता मुलांनी नुसतंच  येऊन समुपदेशकाशी गप्पा मारणं अपेक्षित आहे का? तर आहे पण त्या गप्पांमधून त्या मुलाची जी समस्या आहे तिला हात घालणं आणि त्यामुळे त्याच्या वर्तवणुकीत जे दोष निर्माण झालेले आहेत जे त्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या आड येताहेत किंवा
ज्यामुळे अन्य मुलांपेक्षा वेगळं असण्याची भावना त्याच्यामध्ये उत्पन्न झालेली आहे ती घालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे. 
''Psychotherapy"  च्या माध्यमातून बौद्धिक,भावनिक आणि वागणूक विषयक अपेक्षित सकारात्मक बदल हे काम समुपदेशकाने करणं आवश्यक आहे. 
खरं तर समुपदेशन हा पूर्ण प्रक्रियेचा खूप छोटा भाग आहे,त्यामुळे आजकाल ''school counselor''  ऐवजी ''school psychologist'' ही संकल्पना मूळ धरते आहे. मानस शास्त्रज्ञ हा मुलाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व घटकांबरोबर( शिक्षक,पालक आणि संस्थाचालक) काम करणं अपेक्षित आहे.
मुलाच्या समस्येविषयी शिक्षकांना,पालकांना आणि मुख्याध्यापकांना जागरूक करणं हे त्याचं मुख्य काम आहे,जेणेकरून त्याविषयी हे सर्वजण सतर्क राहावेत असं अपेक्षित आहे. मूलतः शाळेतील मानस शास्त्रज्ञाने मुलं आणि अन्य संबंधित घटक यांमधील महत्वाचा दुवा बनून राहण्याची आवश्यकता आहे.  
सध्या शाळांमधून समुपदेशकाची नेमणूक होत असली तरीही त्याच्या भूमिकेबद्दल अजूनही आपल्या समाजात खूप कमी जागरूकता आहे. त्याच्या भूमिकेविषयी संस्थांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं आवश्यक बाब आहे,कारण मुलांमधील समस्या कळल्यावर त्याला केव्हा आणि कसं समुपदेशकाकडे पाठवायचं आणि त्यापुढची जबाबदारी कशी निभवायची ह्याचं  भान आणि ज्ञान त्यांना असणं  फार आवश्यक आहे.  बरेचदा शिक्षक जबाबदारी ढकलून देण्याच्या किंवा दुर्लक्ष करण्याच्या मनोवृत्तीचे असतात ती मानसिकता घालवून त्यांच्या समान जबाबदारीची जाणीव त्यांना करून द्यावी लागते. 
पालकांच्याही काही निराळ्या समस्या असू शकतात त्यामुळेच मुल आणि पालक यांच्यात सुसंवादाची कमतरता हा एक महत्वाचा प्रश्न सतत समोर असतो.
त्यामुळे पालकांशीही योग्य प्रकारे संवाद साधून मुलांच्या वागणुकीमागची कारणं शोधणं खूप महत्वाचं ठरतं. 
अशा पद्धतीने मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संबंधित घटकांशी सतत संवाद आणि त्यातून योग्य,सकारात्मक बदलाकडे वाटचाल हे समुपदेशकाच   महत्वाच कर्तव्य आणि महत्वाची भूमिका आहे.