Thursday, October 8, 2015

सेल्फी

                                                                 

असच एकदा रस्त्यातून जात असताना अनेक तरुण तरुणी, कुमारवयीन मुलामुलींचे तसेच मध्यमवयीन महिलांचे गट एका गोष्टीमध्ये रममाण झालेले, गुंतलेले मी पहिले आणि वाटलं “सेल्फी” काढण्यात किती विरघळून गेलेत हे सर्वजण! निसर्गरम्य वातावरणात एखादी छानशी पार्श्वभूमी निवडून त्यावर हा ‘सेल्फी’ तर खूपच सुंदर दिसतो म्हणे.. कॅमेऱ्याचा उपयोग खरा तर आयुष्यातील अविस्मरणीय सुंदर क्षण किंवा  घटना  टिपण्यासाठी होत होता , परंतु आता प्रत्येक क्षणीच तो वापरून आपल्या आयुष्याचा तो अविभाज्य भागच झालेला आहे.  जागोजागी, रस्तोरस्ती हे “सेल्फिमय” लोक दिसतात आणि एकच विचार मनात येतो तो म्हणजे जसा रोजच्या रोज आपल्या  चेहऱ्याचा सेल्फी निघतो , तसा सेल्फी घेणारा एकतरी माणूस अंतर्मनाचा ठाव घेतो का?!?
 आपले विचार, मतं, तत्त्वं यांचा सेल्फी घेण्याचं मध्यम काय असावं, याचा विचार करताना कोणी दिसतो का?...नुसतेच चेहऱ्यावर हसू ठेवून चेहऱ्याचा सेल्फी निघेल खरा पण तुमच्या मनाच्या चेहऱ्याचा रंग तुमच्या बाह्य चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत असतो हे तेव्हाच कळेल जेव्हा प्रत्येक नात्यात एकमेकांबद्दल संवेदनशीलता असेल आणि एकमेक परस्परांच्या मनांचाही ठाव घेतील.
समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा मागोवा घेतल्यावर असं वाटतं की, परस्पर नातेसंबंध एवढे प्रदूषित होऊ लागलेत की त्यामुळे जीवनातला आनंद अनुभवण्यापेक्षा मनस्तापच माणसांच्या वाट्याला येतो आणि या नात्यांवरचा विश्वासच उडून जातो. यासाठी माणसांची मनं फार प्रगल्भ होण्याची आवश्यकता आहे. स्वतःबरोबरच आपल्या सोबतच्या सर्वांमध्ये उत्तमोत्तम विचारांची रुजवण करण्याचा प्रयत्न केला तर सर्व समाजच सुंदर बनेल आणि बाह्य सौंदर्य कॅमेर्यात सतत टिपत राहण्याची गरज संपुष्टात येईल.  
परमेश्वराला त्याचा सेल्फी आपल्या सर्वांच्या बरोबर घ्यावासा वाटला तर त्याच्याही पदरी निराशा आल्यावाचून राहणार नाही..याचं कारण एकच ते म्हणजे त्या सृष्टीच्या निर्मात्याला   आपल्या चेहऱ्यावरचे फक्त “सेल्फी’’ साठी चेहऱ्यांवर आणलेले हसू समजल्याशिवाय राहणार नाही.

याचसाठी आपल्या व्यक्तींसाठी आपल्या मनाचाच  देव्हारा इतका सुंदर, निर्म हवा  की इतर कोणत्याही background frame ची गरजच भासणार नाही. 

No comments:

Post a Comment